
संपादकीय: BMT मराठी
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकी नंतर सरकार स्थापन होऊन मंत्री मंडळ देखील स्थापन झाले.मात्र गेली अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदाची जबाबदारी रिक्तच होती.विना पालकमंत्र्यांचेच विधानसभेचे नागपूर अधिवेशन देखील पार पाडले होते.महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांसह घटक पक्षांचे सरकार मोठ्या मताधिक्याने स्थापन झाले असल्याने पालकमंत्री पदाची निवड करण्यात विलंब होत असल्याचे दिसून येत होते.
बिड मधील मस्साजोग चे सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड मधील वातावरण गेली महिनाभरापासून तापलेले आहे.या प्रकरणात वाल्मीक कराड याचे नाव समोर येत असुन कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंधांनमुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याने बीडचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांना देण्यात येऊ नये असा मत प्रवाह निर्माण झाला होता.तर विरोधक तसेच समाजातील विविध घटकांन मधुन बिडच्या पालकमंत्री पदाची धुरा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्वीकारावी अशी मागणी होत होती.
देवेद्र फडणवीस पालकमंत्री ?
बीड मधील मस्साजोग प्रकरणा नंतर बीडचे पालकमंत्री कोण होणार याची चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पालकमंत्री पद स्वीकारावे अशी मागणी होत असताना मी गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेण्यासाठी इच्छुक असुन पक्ष देईल ती जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे सुचक वक्तव्य करून फडणवीसांनी आपली भुमिका काय असेल याचे संकेत दिले होते.
बीड चे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस कडे जाणार हे निश्चित होते.मात्र राष्ट्रवादी कडून बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणावरती सोपवली जाईल याची प्रतिक्षा होती.बीड व पुण्याच्या पालकमंत्री पदाची धुरा राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवली आहे.